लीड्स (वृत्तसंस्था) : इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे संघासाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. खराब कामगिरी सुधारण्यासाठी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराटला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या ५० डावात विराट कोहलीला शतकी खेळी करता आलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या ४ डावात त्याला केवळ १७.२५ च्या सरासरीने ६९ धावा कुटता आल्या आहेत. खराब कामगिरीमुळे विराट अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे विराटने तातडीने सचिनला फोन करून विचारले पाहिजे की मी काय करू? असा मोलाचा सल्ला गावसकर यांनी विराटला दिला आहे.

लीड्स येथे तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराटला केवळ ७ धावा करता आल्या. कसोटीत इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स एडरसनने विराटला ७ वेळा बाद केले आहे. याबाबत गावस्कर म्हणाले की, २००३-०४ साली सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीत झालेल्या चौथ्या कसोटीत संयमाने फलंदाजी केली होती. तेव्हा सचिनने ४३६ चेंडू खेळले होते आणि एकही कव्हर ड्राइव्ह खेळला नव्हता.