मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जिवाला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला, तर महाविकास आघाडी सरकार यासाठी जबाबदार असेल, असे  भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

राम कदम यांनी अर्णब गोस्वामी याला भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जाण्याची तयारी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान देत हिंमत असेल, तर मला अडवून दाखवा, असेही म्हटले आहे. दरम्यान आज (सोमवार) दुपारी ३ वाजता अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामीला अटक करुन तळोजा कारागृहात ठेवले आहे. या प्रकरणी राज्यातील भाजप नेत्यांना अर्णब यांच्या समर्थनार्थ वातावरण तापवले आहे.