सातारा (प्रतिनिधी) : राज्यात मराठा आरक्षणावरुन होणारे राजकारण थांबायला हवे. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करायला हवा. मला नेत्यांना एकच सांगायचंय. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार?, हा उद्रेक एक ना एक दिवस नक्की होईल, असा सूचक इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला आज (गुरूवार) येथे दिला.

नरेंद्र पाटील यांनी स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नरेंद्र पाटील यांच्यासह आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते.

यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की, अण्णासाहेब पाटील यांनी आपले आयुष्य मराठा समाजासाठी अर्पण केले आहे. आपल्याकडे पुढची पिढी आशेने पाहत आहे.  दुसऱ्यांचा लाभ काढून आम्हाला देऊ नका. सर्वांना न्याय दिला, मग आम्हाला का नाही? असा सवाल करून मराठा समाज सर्वांना सधन वाटत आहे. परंतु परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मजुरांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती वाईट आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल.