कोल्हापूर, (प्रतिनिधी ) :  जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही सर्व कार्य प्रामाणिपणे आणि पारदर्शीपणे जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन, अशी सत्यनिष्ठा प्रतिज्ञा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी आज (मंगळवार) केली.

आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी या प्रतिज्ञेसह राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, तहसिलदार अर्चना शेटे, संतोष कणसे, रंजना बिचकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील आदीसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, सर्व व्यक्ती चांगल्या असतात. एखाद्याचीच प्रवृत्ती मोहाला बळी पडते आणि त्यामुळे त्या विभागाला दोष येतो. कोणत्याही आमिषाला अथवा मोहाला अजिबात बळी पडू नका. प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे आपली कार्ये पार पाडा. घेतलेली प्रतिज्ञा अंमलात आणा, असे मार्गर्शन त्यांनी केले.

यावेळी भ्रष्टाचार निर्मूलनाची घेण्यात आलेली शपथ अशी,  जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही सर्व कार्य प्रामाणिपणे आणि पारदर्शीपणे जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन.