उस्मानाबाद (प्रतिनिधी) : येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा उभे करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही, जे करणार ते तुमच्या समाधानासाठी करु, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मी तुम्हाला नवीन नाही किंवा तुम्ही मला नवीन नाही. तुमच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो आहे. या वर्षाची सुरुवात जागतिक संकटाने झाली. वादळ आले आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला आहे. पुढचे सात-आठ दिवस परतीचा पाऊस कायम असेल. तुम्ही माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहात. सवंग लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही. मी जे बोलतो ते करतो, पण जे करु शकत नाही ते बोलणार नाही. तुम्हाला बरे वाटावे, तुम्ही टाळ्या वाजवाव्यात म्हणून मी आकडा घोषित करायला आलेलो नाही. तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. तुम्हाला जास्तीत जास्त ताकद द्यायला आलो आहे.

आज-उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल. तोपर्यंत पंचनामे ८० ते ९० टक्के पूर्ण होतील. अंदाज आलेला आहे. लवकरात लवकर पूर्ण ताकदीनिशी तुमचे आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. धीर सोडू नका, खचून जाऊ नका. पुन्हा आपले आयुष्य जोमाने सुरु करु, यासाठी तुम्हाला दिलासा द्यायला आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला मी इथे आलो आहे.