मुंबई (प्रतिनिधी) : राजकारणातील घराणेशाहीवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर खोचक टीका केली आहे. भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही. पक्षामध्ये तरुण आणि नवीन नेतृत्वाला संधी दिली जाते, असे स्पष्ट करत मी नाव कोणाचे घेत नाही. नाहीतर लगेच ट्रोलिंग चालू होईल. मी कोल्हापूरचा माणूस आहे, ट्रोलिंगला घाबरत नाही. मी ट्रोलर्स खिशात घेऊन फिरतोय, असे मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली.

भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले की, भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण एक दिवसही टीकवता आले नाही. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणावरील सुनावणीला सरकारमधील एकही नेता किंवा मंत्री उपस्थित नव्हता.