पुणे (प्रतिनिधी) : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार भाई जगताप यांची  शनिवारी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आज (रविवार) त्यांनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असे कॅप्टन म्हणून माझे मत आहे, असे जगताप यांनी म्हटले आहे.   

मुंबई महापालिकेत एकेकाळी काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते. मात्र, मागील १० वर्षांमध्ये ही संख्या ३० ते ३५ वर आली आहे. ही संख्या वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणार आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पद्दतीने पार पाडणार असून महापालिका निवडणुकांसाठी मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, संजय निरुपम या सर्वांना सोबत घेऊन लढणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले. आगामी महापालिका निवडणुकीत अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण हा मुद्दा राहणार नाही. भाजपने मेट्रो कारशेडचा मुद्दा राजकीय बनवला असल्याची टीकाही जगताप यांनी केली.