कोल्हापूर (प्रतिनिधी) : गावातील कायदा- सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे गाव कामगार पोलीस पाटील यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम ३५३ चे संरक्षण मिळणार आहे. कर्तव्य बजावत असताना पोलीस पाटलांना मारहाण झाल्यास आता सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा संबंधित आरोपींविरोधात  दाखल केला जाणार आहे. याबाबतच्या सूचना राज्याचे पोलीस महासंचालक यांनी  दिल्या आहेत.

विविध मागण्यांसाठी पोलीस पाटलांच्या राज्यस्तरीय संघटनेने ३ डिसेंबर २०२० रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत मानधन वाढीसह संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती. पोलीस पाटलांना कर्तव्य बजावताना मारहाण झाल्यास संबंधितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा (कलम ३५३ नुसार) गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली होती. याबाबत गृहमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत. पोलीस पाटील सरकारी नोकर या कक्षेत बसत नव्हते. त्यामुळे हे कलम लागू करण्यास मर्यादा येत होत्या. मात्र, यासाठी कलम ३५३ मध्ये ७ जून २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार सुधारणा करण्यात आल्या आहेत.