करवीर (प्रतिनिधी) : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा (ता.करवीर) येथील जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील यांना शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात वीरमरण प्राप्त झाले.

गेल्याच आठवड्यात शुक्रवारी (दि.१३ नोव्हेंबर) रोजी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी (ता.आजरा,जि. कोल्हापूर) येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे हे जवान शहीद झाले होते. आठच दिवसात पाकिस्तानने २ वेळा हल्ला केल्याने पाकिस्तान विरोधात कोल्हापूरसह देशात सर्वत्र संतापाची लाट आहे.

करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने  उचगाव हायवे चौकात शहीद झालेले वीर जवान संग्राम पाटील आणि ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर जोरदार निदर्शने करत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला यावेळी ‘अमर रहे, अमर रहे, वीर जवान संग्राम पाटील अमर रहे, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘जलादो जलादो,पाकिस्तान जलादो’ अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, तालुका प्रमुख विनोद खोत,शिवानंद स्वामी,उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, विक्रम चोगुले,सागर पाटील, संतोष चोगुले,प्रफुल घोरपडे, दीपक पोपटानी, सुनील पारपाणी, बाळासाहेब नलवडे,बाबुराव पाटील, खेताजी राठोड, अजित चव्हाण, पांडुरंग खोत, शफिक देवळे,राजू राठोड रमेश मारवाडी, सदाशिव इंगळे आदी उपस्थित होते.