कागल (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात उच्चांकी १० लाख मे. टन ऊस गाळपाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे प्रतिदिनी ७५०० मे.टन  गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याने जवळपास गाळप क्षमते इतक्या सरासरीने गाळप करून हा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याचे   शाहू प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

व्यवस्थापनाने या हंगामासाठी १० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले होते.या उद्दिष्टपूर्तीसह ऐतिहासिक कामगिरीचा टप्पा पार करून कारखान्याने   10 लाख गळीताचा टप्पा व उद्दिष्ट असे दुहेरी यश संपादन केले आहे.त्यामुळे सभासद कर्मचारी पुरवठादार हितचिंतक यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

कारखान्याचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांनी केवळ ३३ हजार मे. टन उसाच्या उपलब्धतेवर १९८० साली पहिला गळीत हंगाम घेतला होता. त्यावेळी १२५० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याने ७३ हजार ५१३ मे.टन इतक्या उसाचे गाळप केले होते. त्यानंतर यावर्षीच्या ४१ व्या गळीत हंगामामध्ये १० लाख मे.टन उसाच्या गाळपाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.  

या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे म्हणाले की, आमचे आराध्य दैवत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आशीर्वाद, दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कारखाना चालवण्यासाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे, सभासद, शेतकरी, पुरवठादार, तोडणी वाहतूक, कंत्राटदार व हितचिंतक यांचे सहकार्य, अधिकारी-कर्मचारी यांचे कष्ट व व्यवस्थापनाचे योग्य नियोजन यामुळेच हा ऐतिहासिक टप्पा आम्ही पार करू शकलो. या सर्वाप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो.