मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ग्रामीण भागात अद्यापही म्हणाव्या तशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे महिलांना अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईसह राज्यातील महिलांसाठी आता फिरता दवाखाना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

या फिरत्या दावाखान्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना घरातून रुग्णालयात आणणे, त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित सोडणे, यासाठी या फिरत्या दवाखान्याची सुविधा असणार आहे. ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्याला दोन – दोन फिरते दवाखाने दिले जाणार आहेत. ग्रामीण भागासह मुंबईमध्ये या फिरत्या दवाखान्याची संख्या वाढविण्यात येणार आहे. याचे चांगले परिणाम समोर येतील, असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.