मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाउन हा विषय कोणालाच मान्य नाही, आवडत नाही, प्रियदेखील नाही. पण परिस्थिती येते, तेव्हा ऐनवेळी लॉकडाउन करत नसतो. तो अभ्यास करण्याचा विषय असतो. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फर्निसिंगच्या माध्यमातून अनेक बैठकांमध्ये यावर चर्चा केली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मंत्री टोपे म्हणाले की, लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. जसं निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपस्थित झालेल्या क्षेत्राला हात लावू नये, वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातून, परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तत्काळ लॉकडाउनचा निर्णय घेतला जात नाही. निर्बंध कडक करावे लागतात.
रुग्णसंख्या वाढणे ही चिंतेचा विषय आहे. लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. लोकांचा निर्धास्तपणा हा त्याचं मुख्य कारण आहे. कोणत्याही परिस्थितीत जे निर्बंध सांगितले आहेत ते पाळले जावेत, अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा आहे. लग्नाला गर्दी करु नका, विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केलं पाहिजे, असेही ते म्हणाले.