कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले ए. वाय. पाटील आणि भय्या माने यांच्यावर अन्याय झाला आहे. पण या दोघांनाही राज्यात मोठी जबाबदारी देण्यासंबंधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (शुक्रवार) शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. माने हे राष्ट्रवादीकडून पदवीधरसाठी अर्ज भरले असले तरी ते माघार घेणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अरूण लाड यांनी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, यापूर्वीच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भय्या माने यांनी चांगले काम केले. त्यामुळे उमेदवारी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा होती. यातूनच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण पक्षाने लाड यांना उमेदवारी दिली. म्हणून माने हे आपला अर्ज माघार घेतील. त्यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते लाड यांच्या विजयासाठी जीवाचे रान करतील. माने आणि ए. वाय. याच्यावर अन्याय झाला आहे. यासंबंधी जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली आहे. चर्चेत दोघांनाही राज्यात मोठी जबाबदारी मिळेल, असे आश्वासन पाटील यांनी दिली आहे.