चंदगड (प्रतिनिधी) : हेरे (ता. चंदगड) येथील हणमंत कांबळे यांच्या कुटुंबाला त्यांच्याच समाजातील लोकांनी वाळीत टाकलेले आहे. गावातील रवळनाथ देवस्थानचे हे मानकरी कुटुंब आहे. समाजातील लोकांकडून वारंवार शिवीगाळ केली जाते आणि मारहाणीची धमकी दिली जाते. याबाबत चंदगड पोलिसांत तक्रार दिली असता त्यांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही. आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा कुटुंबाला आत्महत्या करणे भाग पडेल, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

 

कांबळे यांनी म्हटले आहे की, आमच्या समाजातीलच पोलीस पाटलांनी इतर कुटुंबांना हाताशी धरून त्यांना लोकांनी आपल्या कुटुंबाला वाळीत टाकले आहे. आम्ही जिथे कामाला जातो त्या ठिकाणी आमच्याबद्दल खोटेनाटे, वाईट सांगून लोकांना आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबद्दल चंदगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता त्यांनी याची दखल घेतलेली नाही. आम्हाला न्याय मिळावा, अन्यथा कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करणे भाग पडेल.