बोरपाडळे (प्रतिनिधी) : शिक्षणासाठी आग्रही असणाऱ्या छ. शाहूंच्या नगरीत आजही ग्रामीण भागातील पन्नास टक्क्याहून अधिक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. यामधे मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. उद्याच्या आत्मनिर्भर गावाच्या विकास संकल्पनेमध्ये गावातील एकही मुलगा, मुलगी उच्चशिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. याची जबाबदारी गाव एक कुटूंब म्हणून ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आ. विनय कोरे यांनी केले. ते पन्हाळा तालुक्यातील वेखंडवाडी येथे बोलत होते.

पन्हाळा तालुक्यातील वेखंडवाडी येथे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आ. विनय कोरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पेन्शनपात्र दहा निराधार महिलांना प्रमाणपत्र वाटपासह गावातील यशस्वी उद्योजक, आजी-माजी, शासकीय, निमशासकीय अधिकाऱ्यांचा ग्रा.पं.च्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना योद्धा,परिसरातील ग्रा.प.सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वच्छ सुंदर गाव म्हणून वेखंडवाडी गावाला पुरस्कार प्राप्तीबद्दल उपस्थित मान्यवरांकडून ग्रामपंचायतीचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

यावेळी पं.स.पन्हाळा माजी सभापती अनिल कंदुरकर ,सरपंच शुभांगी कँदूरकर,उपसरपंच पांडुरंग खोत, रणजित शिदे, मंगेश खोत, ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.