चंदगड (प्रतिनिधी) : माहेरी आलेल्या विवाहितेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना मणिकेरी (ता.बेळगाव) येथे घडली. यल्लूबाई मारुती गावडे (रा. सोनारवाडी, ता.चंदगड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नांव आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा.पं.च्या निवडणुकीत यल्लूबाई गावडे निवडून आल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकऱणी काकती पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१२) यल्लूबाई मणिकेरी (ता. बेळगाव) येथे माहेरी आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी गावाशेजारी असणाऱ्या विहिरीतील पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, दीर, सासरा, सासू असा परिवार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत सोनारवाडी येथील ग्रामपंचायतीमधून त्या विजयी झाल्या होत्या. पण त्यांच्या या आकस्मिक निधनामुळे सोनारवाडी गावावर शोककळा पसरली आहे.