जयसिंगपूर (प्रतिनिधी) : वसंत कानेटकर यांच्या नाटकांनी महाराष्ट्राला भरभरून असे साहित्य दिले आहे. त्यांनी लिहिलेली आणि त्यांची सादर झालेली ऐतिहासिक नाटके दर्जेदार असल्यामुळे यापुढेही ती अनेक वर्षे नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. नाट्य चळवळीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासन सहकार्य करेल. असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले. ते ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त बोलत होते.

नाट्यशुभांगी जयसिंगपूर आणि जयसिंगपूर नगरपरिषदेच्या सांस्कृतिक समितीच्या वतीने जयसिंगपूर येथे सहकार महर्षी शामराव पाटील- यड्रावकर नाट्यगृहात कानेटकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने आणि नाट्यशुभांगीचे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्यकलाकार सुभाष ऊर्फ बाळ टाकळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. कानेटकर यांच्या प्रतिमेचे पूजन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नाट्यकलाकार संजय हळदीकर, अखिल भारतीय नाट्यपरिषद समन्वय समितीचे सदस्य मुकुंद पटवर्धन, नगराध्यक्ष डॉ. नीता माने यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच रायगडाला जेंव्हा जाग येते या नाटकातील छोटासा प्रवेश अमोध कुलकर्णी यांनी इथे ओशाळला मृत्यू या नाटकातील प्रवेश निखिल आणेगीरीकर यांनी सादर केला.