नागपूर (वृत्तसंस्था) : देशात भारत सरकारच्या अखत्यारीत असलेली सर्व वाहने यानंतर पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर धावणार नाही. ती सर्व वाहने स्क्रॅप केली जाणार असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाने घेतल्याचे सांगितले. ते नागपुरात अॅग्रोव्हिजन-२०२२ च्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित होते. 

पेट्रोल डिझेल हें विदर्भातून काय तर देशापासून हद्दपार करण्याचा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमतीने निर्णय घेण्याचा आग्रह केला. कालच त्या निर्णयावर स्वाक्षरी केली. त्या निर्णयामुळे भारत सरकार किंवा सरकारच्या उपक्रमातील १५ वर्षांनंतर सर्व वाहनांना स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाहने १५ वर्षेपूर्ण केल्यानंतर रस्त्यावर धावणार नाहीत हीच नीती इतर राज्यांनी अवलंबत त्यांच्या सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व ट्रक, बसेस १५ वर्षे पूर्ण केलेले स्क्रॅप करावे, असे आवाहन केले.

प्रत्येक जिल्ह्यात एक दोन स्क्रॅप युनिट खुले करतील यातून रोजगार मिळेल आणि प्रदूषण कमी होईल. यातून फ्लेक्स आणि इलेक्ट्रिक वाहन घेण्याचे आवाहन करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. शेतकऱ्यांनीसुद्धा वाहतुकीसाठी इलेक्ट्रॉनिक वाहनाचा उपयोग करून खर्च कमी करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केले.

सध्या इलेक्ट्रिक वाहनाचा फायदा होत आहे. डिझेल आणि पेट्रोल गाड्या रस्त्यावरून हद्दपार होत आहेत. त्यामुळे नव्या पिढीसाठी ही पृथ्वीवर राहण्याजोगी होत आहे. पर्यावरणपूरक इंधनामुळे मोठा बदल आज पाहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले.