इचलकरंजी (प्रतिनिधी) : शासनाने प्रिटींग व्यवसायासाठी लागणा-या कागदाची साठेबाजी थांबवावी. तसेच कागदाच्या कायम होणाऱ्या दरवाढीवर नियंत्रण आणावे. अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी परिसर मुद्रक संघाच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडे देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, जागतिक मंदी आणि विविध कारणांमुळे प्रिटींग व्यवसाय देखील संकटात सापडला आहे. त्यात आता लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरामध्ये देखील भरमसाठ वाढ होत आहे. विशेष म्हणजे कागदाची साठेबाजी करुन त्याची सातत्याने दरवाढ करुन काही व्यापारी मोठा आर्थिक नफा मिळवत आहेत. परिणामी, आधीच विविध कारणांमुळे संकटात सापडलेला प्रिटींग व्यवसाय आणखी संकटात सापडून तो पूर्णपणे उदध्वस्त होण्याचा मोठा धोका वाढला आहे. त्यामुळे कागदाच्या साठेबाजीला आळा घालून त्याच्यावर नियंत्रण आणावे. अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी इचलकरंजी परिसर मुद्रक संघाचे अध्यक्ष विनोद मद्यापगोळ, उपाध्यक्ष महादेव साळी, सचिव सिताराम शिंदे, सदस्य नरेंद्र हरवंदे, गणेश वरुटे, संजय आगलावे, संतराम चौगुले, दिपक वस्त्रे, संजय निकम आदी उपस्थित होते.