कोल्हापूर (प्रतिनिधी) : इतिहासाची कागदपत्रे महाराष्ट्र शासनाने लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करावीत अशी मागणी खा. संभाजीराजे यांनी केली आहे. खा. संभाजीराजे यांनी आज (रविवार) राजस्थानमधील बिकानेर पुराभिलेखागारास भेट दिली. छ. शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या पुरंदरच्या तहाचा अस्सल तहनामा याठिकाणी जतन केलेला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी खा. संभाजीराजे यांनी ही भेट दिली आहे.

औरंगजेबाने स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी जेव्हा मिर्झाराजे जयसिंग याला मोठ्या फौजेनिशी पाठवले. तेंव्हा शिवरायांच्या मावळ्यांनी त्याला शर्थीची झुंज दिली. मात्र, जयसिंगाच्या फौजेपुढे आपल्या सैन्याचे होणारे नुकसान रोखण्यासाठी महाराजांनी तह केला. हा तह म्हणजेच पुरंदरचा तह म्हणून इतिहासप्रसिद्ध आहे. या तहामध्ये छ. शिवाजी महाराजांना २३ किल्ले आणि चार लक्ष होन उत्पन्नाचा मुलुख मुघलांच्या स्वाधीन करावा लागला. या तहाचा संपूर्ण कलमे असणारा अस्सल तहनामा सुमारे २२ फूट लांबीचा आहे.

तसेच छ. शिवाजी महाराजांची आग्रा भेट, औरंगजेबासमोर दरबारात महाराजांनी दाखविलेला स्वाभिमान आणि आग्र्यातून महाराजांनी केलेली सुटका. या सर्व घडामोडींचे वर्णन करणारी मुघल दरबारातील जयपूरचा वकील परकालदास यांच्या अस्सल समकालीन पत्रांची देखील खा. संभाजीराजेंनी याठिकाणी पाहणी केली. यावेळी राजस्थान सरकारने हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा अत्यंत काळजीपूर्वक ठेवून तितक्याच अभिमानाने जपलेला आहे. याबाबत त्यांचे विशेष कौतुक आणि आभार मानले पाहिजेत, असे प्रतिपादन खा. संभाजीराजे यांनी केले.

तसेच महाराष्ट्र शासनाने देखील आपल्या इतिहासाशी संबधित असलेली अशी प्रकाशित आणि अप्रकाशित कागदपत्रे महाराष्ट्रवासीयांना पाहण्यासाठी देखील उपलब्ध करावीत, अशी मागणीही यावेळी केली. यावेळी राजस्थान राज्य पुराभिलेखागाराचे संचालक डॉ. महेंद्र खडगावत उपस्थित होते.