मुंबई (प्रतिनिधी) : हिवाळी अधिवेशानात धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांनी पोलिसांना रोखत पडळकरांना आंदोलन करु दिले.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली नाही. महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते. मग आता तेच नेते गप्प का? असा सवाल पडळकर यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी जे आदिवासींना तेच धनगरांना दिले होते. धनगरांसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण त्यातील एक रुपयाही महाविकास आघाडी सरकारने दिला नाही. यशवंत महामेश योजनाही राज्य सरकारने रद्द केली. हे सरकार धनगर, भटक्या विमुक्त समाजाच्या विरोधात असल्याचा गंभीर आरोपही पडळकरांनी केला आहे.