कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय आज (बुधवार) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सहकार खात्याने आज सायंकाळी त्याबाबतचा आदेश काढला. या आदेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघ, जिल्हा बॅंक आणि राजाराम, दत्त (आसुर्ले-पोर्ले), शरद या साखर कारखान्यांंसह सुमारे एक हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबणार आहे. मागील मार्चपासून आतापर्यंत सुमारे ११ महिन्यांच्या काळात तब्बल सहावेळा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने सहकार वर्तुळातून नाराजी व्यक्त होत आहे.

या संस्थांची ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, त्या टप्प्यावरच स्थगिती देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. ‘गोकुळ’ची प्रारूप यादी प्रसिध्द झाली आहे. त्यावर हरकत दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता तर जिल्हा बॅंकेची ठराव संकलनाची प्रक्रिया कालच संपली असून यादी तयार करण्यासाठी हे ठराव बॅंकेकडे देण्यात आले आहेत. संचालक मंडळाची मुदत गेल्यावर्षी संपलेल्या बहुंताशी साखर कारखाने व संस्थांची प्रक्रिया सुरू होती, आता ही प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत थांबवावी लागणार आहे.