मुरगूड (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील महे येथील कृष्णात भागोजी पुजारी या मेंढपाळाच्या २० कोकरांचा  रानटी प्राण्यांनी फडशा पाडला. यामध्ये या गरीब मेंढपाळाचे सुमारे दीड लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. याच तालुक्यातील सावरवाडी, खुपिरे व कांडगाव पाठोपाठ या आठवड्यातील ही चौथी घटना असल्याने धनगर समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

महे येथील नवाळे मळा नावाच्या शेतीमध्ये कृष्णात पुजारी यांची बकरी बसविण्यात आली होती. मंगळवारी सकाळी बकरी चरण्यासाठी गेल्यानंतर तळावर लहान पिले (कोकरे) ठेवण्यात आली होती. परंतु तळावर कोणी नसल्याने रानटी प्राण्यांनी या कोकरांवर हल्ला केला. यामध्ये एक मयत असून ११ पिल्ले गंभीर जखमी झाली असून ८ पिल्ले गायब आहेत. यामध्ये पुजारी यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

करवीरचे वनपाल विजय पाटील, करवीरचे वनरक्षक रुपेश मुल्लाणी, राहुल जोधवाल, डॉ, वाळवेकर व जि. प. चे डॉ. इंगळे यांनी भरपावसात रात्री पंचनामा केला. या वेळी धनगर समाजाचे नेते बबनराव रानगे, सरपंच सज्जन पाटील, उपसरपंच रुपाली बोराटे, शाहीर युवराज पुजारी, बळीराम लांडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.