शिरोळ (प्रतिनिधी) : देशातील खासगी व निमशासकीय क्षेत्रातील ६७ लाख पेन्शन धारकांना आत्मनिर्भरपणे जगता यावे, यासाठी प्रतिमहा ९ हजार पेन्शन करावी, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत शुन्य प्रहारात केली.

खा. माने यांनी संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनात पेन्शन सारख्या महत्वपूर्ण विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. गेली अनेक वर्षे संपूर्ण देशभर ईपीएस – ९५ (कर्मचारी पेन्शन योजना) पेन्शन धारकाचे सुरू असलेल्या आंदोलनावर सभागृहात प्रकाश टाकला. देशात ७६ लाख इतक्या पेन्शनधारकाना प्रतिमहा १ हजार पेन्शन मिळते. यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह तर होत नाहीच, पण त्यांच्या औषधांचा खर्चही निघत नाही. यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व हलाखीचे जीवन जगावे लागतं आहे. त्यामुळे  केंद्र सरकारने पेन्शन योजनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करावेत. कोशियारी समितीने केलेल्या शिफारशीचा स्वीकार व विचार करून ९ हजार प्रतिमाहिना बेसिक स्वरूपाची पेन्शन द्यावी व महागाई भत्ता किंवा मोफत आरोग्य सुविधा द्याव्यात, अशी मागणी खा. माने यांनी केली.