मुंबई (प्रतिनिधी) : एका तरूणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, अशी मागणी केली आहे. सध्या या युवकाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माझे सध्या वय ३५ वर्ष झाले असून आजपर्यंत माझे लग्न झालेले नाही. त्याचे कारण असे की मी मागील सात वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु काही ना काही कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे त्यांची एकच मागणी असते की मुलगा जॉबवर पाहिजे, असे गजाननने पत्रात लिहिले आहे.

आपण अजून कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण आहे. आपण मला एकतर जॉब द्यावा. अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे, ही नम्र विनंती. अशी अजब मागणी गजानन नावाच्या एका युवकाने केली आहे. यापूर्वीही जनतेमधून मुख्यमंत्र्यांना अशी पत्रे गेले आहेत. त्यातील एका पत्राने डोळ्यात पाणी आणल होतं. पत्राद्वारे चिमुरड्यांनी आपल्या वडिलांना कुटुंबासाठी वेळ देता यावा, म्हणून मुख्यमंत्र्यांना साद घातली होती.