कोल्हापूर (प्रतिनिधी) : गुजरात दंगलप्रकरणी तब्बल वीस वर्षांच्या न्यायालयीन संघर्षास संयमीपणे सामोरे जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील काँग्रेसच्या जकिया जाफरी यांची याचिका निकाली काढून सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब केल्याने भाजपाची मान अभिमानाने उंचावली आहे. ताज्या पोटनिवडणूक निकालाने देशातील सर्वसामान्य जनतादेखील मोदी आणि भाजपसोबत असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

वीस वर्षे चाललेल्या या न्यायालयीन लढाईत भाजपने कोठेही शक्तिप्रदर्शन, आंदोलने किंवा टीकाटिपणी करून न्यायप्रक्रियेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, असा टोला त्यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे. लोकसभेच्या तीन व विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने प्रस्थापित पक्षांचे बुरुज उद्ध्वस्त करून पक्षाचा झेंडा रोवला आहे, असे चिकोडे म्हणाले.

सन २००२ मधील गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ जणांना निर्दोष ठरविण्याच्या विशेष चौकशी पथकाच्या निर्णयास काँग्रेसच्या जकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही विशेष चौकशी पथकाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने पंतप्रधानांविरोधातील राजकीय कारस्थानास चपराक बसली आहे, असे ते म्हणाले.