कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूरातील गंगावेश ते छ. शिवाजी पूल हा रस्ता पन्हाळगड, विशाळगड, जोतिबासह अनेक प्रमुख महत्वाच्या ठिकाणांना जोडणारा मार्ग आहे. या मार्गावरून अवजड वाहनांसह मोठ्या प्रमाणावर वाहतूक होतं असते. हा रस्ता पूरबाधित मार्ग असल्याने येथे कायमस्वरूपी टिकाऊ कॉक्रिटचा रस्ता करावा. अशी मागणी आखरी रास्ता कृती समिती शिवसेना संयुक्त उत्तरेश्वर आणि शुक्रवार पेठ यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहेकी, शहराच्या स्मशानभूमीकडे जाणारा हा मार्ग असल्याने, या मार्गाला आखरी रास्ता संबोधले जाते.  या रस्त्याच्या उजव्या बाजूला महानगरपालिकेचे पंचगंगा हॉस्पिटल आहे. येथे पेशंट, नातेवाईक, रुग्णवाहीका आणि इतर वाहनांची नेहमीचं वर्दळ असते. गेली अनेक वर्षे हा रस्ता दुरावस्थेत असुन प्रत्येक वर्षीच्या पूरपरिस्थितीने या मार्गाची आणखीन दुरावस्था झाली आहे. यासाठी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने गेली तीन वर्षे जनआंदोलन सुरु केले आहे. यातंर्गत ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन याचे काम पूर्ण झाले असुन महापालिकेने डांबरी रस्त्याचे नियोजन केले आहे.

परंतु, कृती समितीची शुक्रवार गेट ते पिकनिक पॉईंट-छ. शिवाजी पूल हा रस्ता प्रतीवर्षी पूरबाधित होत आहे. त्यामुळे हा मार्ग कॉक्रिंटचा करावा. तरी या रस्त्याला मंजुरी देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, या मागणीचा योग्य विचार करणार आहे. तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना याविषयीचा पाठपुरावा करण्यास सांगितले.

यावेळी, किशोर घाटगे, रियाज बागवान, नंदू मोरे, निलेश हंकारे, सुरेश कदम, राकेश पाटील, राकेश पोवार, सनी अतिग्रे, सागर कलघटगी, अनंत पाटील, सूरज धनवडे आदी उपस्थित होते.