गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील जखीनपेठ येथील पवनचक्की कापून लंपास करणारी टोळी भुदरगड पोलिसांनी गजाआड केली. यात मुख्य सुत्रधारासह ७ जणांना अटक केली आहे. तर दोघेजण फरार झाले आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून ट्रक, मोटरसायकल, गॅस सिलेंडर, कटर आणि पवनचक्कीचे साहित्य असा सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जखीनपेठ येथील पठारावर मारूती विंड कंपनीने पवनचक्की बसविली आहे. या ठिकाणचे साहित्य चोरीस जात असल्याची चर्चा होती. त्यामुळे पोलिसांची बारीक नजर होती. पोलीस निरिक्षक संजय पतंगे आणि त्यांच्या पथकाने गुरूवारी रात्रभर पाळत ठेवली असता, पहाटेच्या सुमारास जखीनपेठ राणेवाडी दरम्यान ट्रक धावतांना आढळून आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता, ट्रकमध्ये पवनचक्कीचे साहित्य, ६ मोठी आणि दोन लहान गॅस सिलेंडर, गॅस कटर आढळून आले. पोलिसांनी ट्रक, एक मोटरसायकल, गॅस सिलेंडर, गॅस कटर असा सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी प्रकाश कळमकर (वय ५२),  रमेश हरी खोत (वय ५३, रा. दोघे रा. हणबरवाडी), बापू नामदेव गोंधळी (वय ३५), शिवाजी मारूती भोसले, महेश मुरलीधर कलकुटकी (रा. गारगोटी), अनिल आनंदा सुतार (वय ३०,रा. पडखंबे), चंद्रकांत नामदेव पाटील (वय २९, रा. मोरेवाडी) यांना अटक झाली असून, दिपक सखाराम माने (रा. गारगोटी), अशोक गणपती बावकर (रा. जखीनपेठ) हे दोघे फरार आहेत. अधिक तपास पोलीस निरिक्षक संजय पतंगे करत आहेत.