गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात भाजपा सरकारने विरोधी पक्षाची मतं जाणून न घेता असंसदीय पद्धतीने आवाजी मतदानाने शेतकरी-कामगार वर्गाला भांडवलदारांच्या दावणीला बांधणारे अन्यायकारक काळे कायदे समंत करून घेतले आहेत. तसेच हाथरस येथील पिडितेच्या कुटुंबियांची विचारपूस करण्यास जात असलेल्या काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेधार्थ गडहिंग्लज येथे राजर्षि शाहू महाराज कृषि उत्पन्न बाजार समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांचे समन्वयक विदयाधर गुरबे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलनाला सुरवात झाली. यावेळी धरणे आंदोलनात केंद्रीय भाजपा सरकारने संमत केलेल्या शेतकरी-कामगार कायद्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर अॅड. दिग्विजय कुराडे यांनी या धरणे आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. अमर गोडसे यांनी हुकूमशाही प्रवृत्तीचे हे भाजपा सरकार शेतकरी-कामगार विरोधात कायदे समंत करून कशा पद्धतीने हा देश आणि या देशाची अर्थ व्यवस्था भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट घालीत असल्याचे सांगितले.

तसेच गडहिंग्लज शहर काँग्रेसचे अध्यक्ष बसवराज आजरी यांनी, शेतकरी-कामगार वर्गाला देशोधडीला लावणारया कायद्यांचा जोरदार विरोध करत राहूलजी गांधी यांना झालेल्या धक्का बुक्कीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. काँग्रेसचे नेते किसनराव कुराडे यांनी केंद्र सरकारच्या भोंगळ टिका करत भाजपा सरकारच्या कार्यकाळात लोकशाही मुल्य पायदळी तुडवली जात असल्याचे सांगितले.

धरणे आंदोलनात स्वयंप्रेरणेने पक्षीय मतभेद बाजूला ठेऊन माजी आमदार आणि जनता दलाचे नेते श्रीपतरावजी शिंदे यांनी सामील होत या आंदोलनाला पाठिंबा दिला. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस विदयाधर गुरबे यांनी केंद्र सरकारचा जोरदार निषेध करत शेतकरी-कामगारांच्या हिताचे सरंक्षण करण्यास जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत कायमच शेतकरी-कामगार वर्गाच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात भव्य आशी शेतकरी सह्यांची मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. तसेच या आंदोलनात काँग्रेस नेते राहूलजी गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध नोंदविण्यासाठी गडहिंग्लज-संकेश्वर येथे रस्ता रोको करण्यात आले.

यावेळी चंदगड विधानसभा मतदार संघाचे माजी सरचिटणीस अजिंक्य चव्हाण, प्रदीप पाटील,अजित बंदी, राम परीट, दयानंद पट्टणकुडी, तम्मना पाटील, राजशेखर येरटे यांच्यासह गडहिंग्लज तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.