नांदेड (प्रतिनिधी) : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन सरकारला जाब विचारला आहे. शाहू महाराजांनी २०० वर्षांपूर्वी बहुजन समाजाला आरक्षण दिले. केवळ मराठ्यांना दिले नाही. त्यावेळच्या बहुजनांमध्ये मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र, आज मराठा समाज प्रवाहाच्या बाहेर का? मराठा समाजाला आरक्षण का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. ते नांदेडमध्ये एका सभेत बोलत होते.

खासदार संभाजीराजे म्हणाले, माझा लढा केवळ मराठा समाजासाठी नाही तर संपूर्ण बहुजन समाजासाठी आहे. न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. मी या मताचा आहे. अनेक नवे कार्यकर्ते तयार होतात. मात्र त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी कसे काम केले हे माहित नाही. शिवाजी महाराजांनी फक्त मराठ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केले नाही, तर अठरापगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराज देखील माझे स्वराज्य हे अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचं असल्याचं सांगतात.