कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  स्तनाचा कर्करोग आणि पर्यावरणाचा ऱ्हास याबाबत  जनजागृती करण्यासाठी ऑटो रिक्षातून  तीस दिवस उत्तर भारताची सफर करणार  आहोत, अशी माहिती रजत ओसवाल आणि डॉ. नम्रता सिंग यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिली.

उत्तर भारत हा हिमालयाच्या पर्वतरांगांनी नटलेला आहे. आजपर्यंत सायकल, बुलेट अशा अनेक माध्यमातून अनेकांनी साहसी प्रवास केलेला आहे. पण ऑटोरिक्षातून हा साहसी प्रवास  कोल्हापूरचा रजत ओसवाल आणि बेंगळुरूच्या डॉ. नम्रता सिंग  पहिल्यांदाच करणार आहेत. या प्रवास मोहिमेचा शुभारंभ कोल्हापुरातून न्यू पॅलेस, कसबा बावडा येथून रविवारी  (दि.२०)   सकाळी ९ वाजता होणार आहे. या शुभारंभप्रसंगी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, मालोजीराजे छत्रपती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ही सफर मोहीम तीस दिवसांची असून याचा मार्ग पुणे, मुंबई, सुरत, वडोदरा, उदयपूर, अजमेर,  जयपूर, आग्रा, नवी दिल्ली, शिमला, मनाली, धर्मशाला, डलहौसी,  अमृतसर, चंदिगढ, नवी दिल्ली, आग्रा,  झाशी, भोपाळ, इंदूर,  नाशिक,  पुणे असा  जवळपास ४५००  ते ५००० किलोमीटरचा प्रवास  आहे. तसेच या प्रवासादरम्यान ‘स्तनाचा कर्करोग’ आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी ‘एक झाड लावा एक झाड वाचवा’ याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेला जयेश ओसवाल उपस्थित होते.