कोल्हापूर (प्रतिनिधी) : आई अंबाबाईलाही कोरोनाची लस दिली म्हणून त्या नावावर ते पैसे उचलतील. त्यामुळे आई अंबाबाईला त्यांच्या तावडीतून लवकरात लवकर मुक्त करा, अशी मागणी कोल्हापुरातील राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी केली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभारातील भ्रष्टाचार, देवीच्या साडी विक्रीमधील भ्रष्टाचार,  पगारी पुजा-यांच्या रखडलेल्या नेमणुका, प्रसाद विक्री असे विविध मुद्दे मांडण्यात आले आहेत. तसेच देवीला भेट म्हणून आलेल्या साड्या उच्चभ्रू कुटुंबातील लोकांनाच दिल्या जातात याचे नेमके कारण काय ? या साड्या बहुजन समाजातील गोरगरीब माता-भगिनीनाही द्याव्यात अशी मागणीही महिलांनी यावेळी केली.

ना. हसन मुश्रीफ म्हणाले, सध्या देवस्थान समितीचे प्रशासक जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या कामकाजात भ्रष्टाचाराला थारा नाही. त्यामुळे ते चौकशी करून नक्की कारवाई करतील, असे आश्वासन दिले.

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी, आपण या प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून कारवाई सुरू केली असल्याचे सांगितले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनिता पाटील, कार्याध्यक्षा गीता हासूरकर, शहराध्यक्षा सुधा सरनाईक, सचिव सुवर्णा मिठारी, शहर उपाध्यक्ष लता जगताप, रेशमा पवार, विद्या पवार, सुषमा डांगरे, शारदा पाटील, महिला उपस्थित होत्या.