भिवंडी (प्रतिनिधी) : आईसह तीन चिमुकल्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. ही घटना भिवंडीतील उबंरखांड पाच्छापूर जंगलात घडली आहे. पत्नी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून वडिलांनी देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

श्रीपत बच्चू बांगारे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांची मयत पत्नी रंजना (वय ३०), मुलगी दर्शना (वय, १२), रोहिणी (वय ६) आणि मुलगा रोहित (वय ९) अशी झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या चौघांची नावे आहेत.

श्रीपत यांचा भाऊ जंगलात गेला असताना दुर्गंधी आल्याने झुडपात पाहिले तेव्हा सडलेले मृतदेह दिसले. कपड्यावरून वहिनी आणि पुतणे पुतणी असल्याची ओळख पटली आणि श्रीपतला ही बाब सांगितले. हे दृश्य पाहून श्रीपत यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात तिघांनी सामूहिक आत्महत्या का केल्या? की कुणी हत्या करण्यात आली याचा पोलिस तपास करीत आहेत.