टोप (प्रतिनिधी) : जनसुराज्य पक्षाकडून सन २००४ ला आमदार झालेले राजीव किसन आवळे यांना गत विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी दिली नसल्याने त्यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी चांगली मतेही घेतली होती. यानंतर ते कुठे जाणार, अशी चर्चा होती. पण सध्या ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

यामुळे हा जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांना मोठा धक्का आहे. राजीव आवळे यांनी या पक्षातून ३ वेळा निवडणूक लढवली होती. यामध्ये एकदा ते निवडून आले होते. यामुळे या परिसरात त्यांना मानणारा गट आहे. त्यांच्या निकटवर्तीयांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.

राजीव आवळे यांच्यासह इचलकरंजी शहरातील आणि ग्रामीण भागातील नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यामुळे हातकणंगले तालुक्‍यात राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळाल्याचे दिसत आहे.