नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज (सोमवार) सकाळी पावणे नऊ वाजता संसदेत दाखल झाल्या. त्याआधी अर्थ मंत्रालयामधून संसदेत जाण्याआधी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बदल केल्याची माहिती पत्रकारांना दिली. त्यामुळे कोरोनामुळे यंदा अर्थसंकल्प सादर करण्याची पारंपरिक पद्धत मोडीत निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे पेपरलेस असेल, अशी माहिती दिली. नेहमीप्रमाणे खाता बही म्हणजेच कागदपत्रं असणारी बॅग आणण्याऐवजी यावेळी सीतारामन यांच्याकडे लॅपटॉप असल्याचे पहायला मिळाले. लाल रंगाचे कव्हर असणाऱ्या या लॅपटॉपवर राजमुद्रेचे चिन्हं होते. सीतारामन आणि अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर अर्थ मंत्रालयामधून संसदेत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी कोरोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा पेपरलेस असेल, असे सांगितले.  अर्थसंकल्पाची डिजिटल कॉपी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.