कोल्हापूर (प्रतिनिधी) :  गेल्या तीन दिवसापासून अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी जल उपसा केंद्रामध्ये पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे ही पाणी उपसा प्रक्रिया केंद्रे बंद झालेली आहेत. त्यामुळे शहरातील जवळ जवळ ८० टक्के भागातील पाणी पुरवठा शुक्रवार दि. २३ जुलै २०२१ पासून बंद झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय करणेच्या दृष्टीने महापालिकेच्यावतीने टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आले.

शहरातील ब-याचशा भागात पुराचे पाणी पसरत असलेने प्रत्येक भागाला पाणी वाटपाच्या टँकरसाठी शहरातील पाणी न आलेल्या रस्त्यावरून पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे टँकरमधून पाणी वाटपास एखाद्या भागात उशीर होऊ शकतो.  तसेच सध्या कोरोनाचा  प्रादुर्भाव असलेने टँकरव्दारे उपलब्ध होणारे पाणी नागरीकांनी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करून, तोंडाला मास्क लावून आवश्यकती खबरदारी घेऊन भरून घ्यावे. वेदशाळेकडून पुढील एक आठवडा पाऊस पडणेचा अंदाज वर्तविला असलेने पुर परिस्थिती पुर्ववत होईपर्यंत नागरीकांनी टँकरव्दारे उपलब्ध होणारे पाणी पिण्यासाठी वापरावे. खर्चाच्या पाण्यासाठी इतर स्त्रोतातुन नियोजन करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.