मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. आता महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानेही काँग्रेसच्या सुरातसूर मिसळला आहे. सपाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी एका व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नामांतर करण्याआधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, असे आवाहन केले आहे.

अबू आझमी म्हणाले की, शहरांची नावं बदलून कुणाचं पोट भरत नाही. शहरांना आवडीचं नाव ठेवायचंच असेल, तर नवी शहरं वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीनं नामांतर करणं योग्य नाही. नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या. रायगडचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणं हे आपल्याला शोभत नाही.

महाराष्ट्रात जगभरातून, देशातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढं घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचं कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचे काम करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही, असेही आझमी यांनी म्हटले आहे.