पुणे (प्रतिनिधी) : सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता महाराष्ट्रानेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषित केलं आहे.

गुरुवारी झालेल्या बैठकीत शिक्षण विभागाचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजूर केला आहे. शिक्षणमंत्र्यांकडून परीक्षा रद्द करण्याबाबतची फाईल आपत्ती व्यवस्थापन विभागाला काल पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज विभागाने यास मंजूरी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे.

बुधवारी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या की, शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला याबाबतची फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची यासंदर्भात बैठक होईल. त्यात ते या फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार तुम्हाला अतिरिक्त माहिती देण्यात येईल. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.