कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आज (मंगळवार) लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन विधान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन समाजामध्ये, दोन राजकीय पक्षामध्ये तेढ निर्माण होऊन वातावरण बिघडविण्याचे काम राणे यांनी केले आहे. राज शिष्टाचाराच्या बाबतीत ही असे वक्तव्य कायद्याच्या चौकटीत बसत नसावे. मंत्री असो किंवा सामान्य नागरिक देशाचा कायदा हा सर्वांना  सारखाच असतो. तरी अशा घातक प्रवृत्तीविरोधात गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करण्यात यावी.