हातकणंगले (प्रतिनिधी) : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यास महाराष्ट्रातील हजारो शेतकरी सज्ज झाले आहेत. यासाठीच सोमवार २५ रोजी सकाळी सांगली येथून कोल्हापुरातील छ. शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी आपला ट्रॅक्टर घेऊन सामील व्हावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते आज (शनिवार) आळते (ता. हातकणंगले) येथे आयोजित शेतकरी बैठकीत बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले की, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, शेतकऱ्याच्या पाठीशी राहण्यासाठी वेळ पडल्यास हजारोंच्या संख्येने माझे महाराष्ट्रातील दिल्लीवर कूच करतील. महाराष्ट्राला गनिमीकावा करून युद्ध कसे जिंकावे लागते, हे सांगावे लागत नाही, यांची नोंद केंद्र सरकारने घ्यावी.

या बैठकीत पंचायत समिती सदस्य प्रवीण जनगोंडा, संदीप कारंडे, संजय पाटील, मोहन कोळेकर, गुलाब मुल्लाणी, आण्णासाहेब पाटील, शीतल शेटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.