टोप (प्रतिनिधी) :  आज (शुक्रवार) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळून टोप इथे भरत संभाजी वाणी (वय ४२, रा. टोप) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. भरत हा कासारवाडी येथील शेतात ऊसाला पाणी पाजत असताना मोठा पाऊस आल्याने शेजारील लिंबाच्या झाडाखाली आसरा घेण्यासाठी गेले असता झाडावर वीज पडून ही दुर्घटना घडली. यावेळी त्यांची दोन मुले किरकोळ जखमी झाले आहेत.

आज सायंकाळच्या सुमारास भरत वाणी हे आपली दोन मुले करण आणि अर्जुन या दोघांना सोबत घेऊन शेतामध्ये होते. कासारवाडी येथे अवकाळी पाऊस सुरू झाल्यावर तिघेही शेतातील लिंबाचे झाडाच्या आडोशाला उभे राहिले. यावेळी विज पडून भरत वाणी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या दोन्ही मुलांनी तेथून पळ काढल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत.