मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील  ठाकरे सरकार पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत आहे.  मुख्यमंत्र्यांनी देखरेखीचे काम करणे अपेक्षित असते. मात्र, बदलीपासून प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या हस्तक्षेप होताना दिसत आहे.  सरकारच्या या हस्तक्षेपाला कंटाळूनच पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल  यांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरूवार) येथे केला.

पोलिसांच्या बदल्यांवरून राज्य सरकारशी झालेल्या वादानंतर केंद्रात परत जाण्याचा निर्णय पोलीस  महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घेतला. त्यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली. यावरुनच  फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.  ही परिस्थिती महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावह नाही. राज्य सरकारच्या हस्तक्षेपाला कंटाळूनच जयस्वाल यांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.