कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील छोटे विक्रेते, फेरीवाले, दुकानदार यांना सहा महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर आर्थिक उत्पन्नाची घडी बसण्यास मदत होणार आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सध्या दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असतात. ती वेळ आता दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढवून व्यवसायासाठी, दुकाने सरू ठेवण्यासाठी रात्री ९ पर्यंत परवानगी द्यावी. अशी मागणी आज (मंगळवार) भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे ईमेल द्वारे करण्यात आली.

गेली ६ महिने कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य नागरीक, हातावर पोट असणारे लोक, छोटे व्यापारी यांना याची सर्वाधिक आर्थिक झळ पोचली आहे. कायदा व सुव्यव्स्थेचे पालन करत छोट्या व्यवसायीकांनी लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केले आहे. सध्या अनलॉक ५ सुरु झाले आहे. यामध्ये हॉटेल, मॉल, दुकाने, व्यापार, जिल्हा अंतर्गत व राज्य अंतर्गत प्रवास अशा अनेक गोष्टी पूर्ववत होताना दिसत आहेत. ५ ऑक्टोंबर पासून कोल्हापूरातील बार, हॉटेल्स सुरु करायला प्रशासनाने परवानगी दिली आहे. परंतु हे सर्व पर्याय खुले होत असतना छोट्या व्यवसायीक, दुकानदार यांच्यावर दुकाने ७ पर्यंत सुरु ठेवण्याच्या बंधनामुळे अनेक निर्बंध येत आहेत. नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या मोठ्या सणांची सुरवात होत आहे. यासाठी नागरीक मोठ्या संख्येने खरेदी करत असतात.

छोटे विक्रेते, फेरीवाले, दुकानदार यांना सहा महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर आर्थीक उत्पन्नाची घडी बसण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकाने सुरू ठेवण्यासाठी रात्री ९ पर्यंत परवानगी द्यावी. अशी मागणी आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्यावतीने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना ईमेल द्वारे करण्यात आली.