कोल्हापूर (प्रतिनिधी) : राशिवडे व चांदे रस्त्यावर १०० हून अधिक मृत कोंबड्या प्लास्टिक बारदानात बांधून फेकल्याबाबत वृत्त चुकीचे असून ती अफवा असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एस. पठाण यांनी आज (मंगळवार) पत्रकाद्वारे स्पष्ट केले. प्राण्यांच्या रोगासंदर्भात वृत्तांकन करताना पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून शहानिशा करावी, असे शब्दांत पठाण यांनी संबंधितांना कानपिचक्या दिल्या आहेत.

पत्रकात म्हटले आहे की, राशिवडे, चांदे रस्त्यावर १०० हून अधिक मृत कोंबड्या प्लास्टिक बारदानात बांधून फेकल्या असल्याचे वृत्त ‘दै. तरुण भारत’चे वार्ताहर रंगा लाड यांनी व्हॉटस्ॲपद्वारे पसरवले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या निर्देशानुसार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, पशुधन पर्यवेक्षक सुनील काटकर आणि हसूर दुमाला येथील पशुधन पर्यवेक्षक यांनी गावकऱ्यांसोबत घटनास्थळाला भेट देऊन शहानिशा केली. त्यांना चिकन सेंटरवरील कोंबडीची पिसे, एका कोंडीचा कुजलेला सांगाडा व एक पांढरे बारदान आढळून आले. या बारदानामध्ये घरातील कचरा, पत्रावळी, द्रोण, चहाचे कप, नारळाच्या शेंड्या इ. साहित्य आढळून आले.

या अधिकाऱ्यांसमोर सोमवारी रात्री १.२० च्या सुमारास राशिवडेच्या सरपंचांसमोर पंचनामा करून वस्तुस्थितीचा व झालेल्या वृत्तांकनाचा खोटारडेपणा निदर्शनास आणून दिला. परिसरात पसरलेली घाण तत्काळ साफ करण्याबाबत निर्देश देण्यात आले. परिसरातील कुक्कुट प्रक्षेत्रांना भेट देऊन रोगराई संदर्भात तपासणी व प्रतिबंधक उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्ह्यात सांसर्गिक रोग निर्मूलन समिती कार्यरत असून पशुसंवर्धन विभागामार्फत पक्ष्यांमधील रोगराई संदर्भात रोग नमुने पाठवून शहानिशा केली जाते. पशुसंवर्धन विभाग शेतकरी, पशुपालक व जनमानसात प्राण्यांपासून होणाऱ्या रोगाबाबत दक्ष असतो. त्यामुळे प्राण्यांच्या रोगासंदर्भात वृत्तांकन करताना पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून शहानिशा करणे आवश्यक आहे.