टोप (प्रतिनिधी) : छत्रपती राजाराम साखर कारखान्याचा कारभार पारदर्शक असून विरोधकांनी चांगल्या कामांना विरोध करू नये. विरोधकांना सहकार मोडीत काढून खाजगीकरण करायचे आहे, असा आरोप माजी आ. अमल महाडिक यांनी केला आहे. ते टोप (ता. हातकणंगले) येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. राजाराम सोसायटीचे चेअरमन भगवान पाटील अध्यक्षस्थानी होते.

या वेळी महाडिक म्हणाले की, कारखान्यास पाच हजार टन ऊस गाळप क्षमतेची परवानगी मिळाली असून त्याचे काम या हंगामानंतर सुरू होईल. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन ऊस उत्पादन वाढीसाठीचे उपक्रम कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक माहिती संकलित केलेले पुस्तक सभासदांना देण्यात येणार असल्याचे महाडीक यांनी सांगितले.

यावेळी महाडिक यांनी विविध शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यावर काय उपाय़ोजना करता येतात याची माहिती दिली. या वेळी कल्लेश्वर मुळीक, अरुण गायकवाड, एस. एम. पाटील, आनंदराव पाटील, बाबासाहेब पाटील, विठ्ठल पाटील, संभाजी महाडिक, नागेश पाटील यांच्यासह छ. राजाराम, वसंत आणि दत्त विकास सोसायटीचे संचालक आणि शेतकरी उपस्थित होते.