कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने २५ तारखेच्या पुकारलेल्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील असून राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने शेतकरी कायदा संमत केल्याच्या विरोधात कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.

मोदी सरकारने राज्यसभेत ३ शेतकरी विधेयकांना मंजुरी दिली आहे. या विधेयकाचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. देशातील शेतकऱ्यांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या विधेयकांचा तीव्र विरोध केला असून या मधून शेतकर्यांना कोणताच लाभ होणार नसल्याचे जाहीर केले आहे.

सरकार हमीभावातून शेतकऱ्यांन बाजूला सारत आहेत. या शेतकरी धोरणाविरोधात देशभरातील शेतकरी संघटनामध्ये तीव्र अंसतोष पसरलेला आहे. या विधेयकाच्या विरोधात २५ सप्टेंबर रोजी सर्व पक्षीय भारत बंद पुकारला आहे. या भारत बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या शेतकरी विरोधी विधेयकाचा विरोध करण्यासाठी २५ तारखेच्या बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.