कोल्हापूर (प्रतिनिधी) : रामानंदनगर येथील ओढ्याचे पाणी आज (गुरुवार) आजूबाजूच्या घरांमध्ये शिरले. दक्षिणचे आ. मा. ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली. या वेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी २५ वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे, मूळ समस्या सुटली नसल्यामुळे आम्ही २ महिने आंदोलन करत आहे. हे सगळं लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांना दिसत नाही का? असा प्रश्न आ. ऋतुराज पाटील यांना केला. यावर आ. पाटील निरुत्तर झाले.

लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतील तर त्याचा आम्हाला आदरच आहे, परंतु प्रश्न सुटला पाहिजे असे देसाई म्हणाले. रामानंदनगर, जाधव पार्क या भागातील २५० घरांमध्ये पाणी शिरते. दरवर्षी प्रापंचिक साहित्याचे नुकसान होते, नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागते. वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक महापालिका आतातरी करेल का असा सवाल परिसरातील नागरिक करत आहेत.