कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बहुतांशी भाग वनक्षेत्राने व्यापलेला आहे. या ठिकाणी दुर्मीळ औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यासाठी आयुष मंत्रालयामार्फत संशोधन व प्रक्रिया  केंद्र स्थापन करावे, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.                          

यावेळी खा. धैर्यशील माने म्हणाले की,  हातकणंगले मतदारसंघातील सदरचा भाग  युनेस्कोचा जागतिक वारसा असणाऱ्या पश्चिम घाटमाथ्याच्या अंतर्गत येतो. त्याचप्रमाणे जगातील पहिल्या ८ जैवविविधता हॉटस्पॉट साइटमध्येही याचा समावेश आहे. या भागामध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या नरक्या, मधुमेहाच्या उपचारात वापरण्यात येणारे सप्तरंगी,  डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी गीलोही, आयुर्वेदातील औषधांची राणी मानली जाणारी शतावरी ज्याचे मूळ  पाचक प्रणालीचे आजार,  रोग प्रतिकारशक्ती बूस्टर व घशात संक्रमण, ब्राँकायटिस यासाठी उपयुक्त आहे.

या व्यतिरिक्त त्रिफळा चूर्णचे महत्त्वाचे अवयव हिरडा,  बेहेडा आणि आवळा आणि शिककाई, गुळवेल, रानहळद, रानभेंडी, खैर, करवंद, जांभूळ, चिंच इत्यादी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे स्थानिक लोक बर्‍याच वर्षांपासून विविध रोगांच्या उपचारांमध्ये या वनस्पतींचा औषध म्हणून पारंपरिक पद्धतीने वापर करत आहेत. या क्षेत्रात अशा अनेक प्रगत ज्ञान प्रणाली आहेत. ज्या बर्‍याच आजारांपासून बचाव, प्रतिबंध आणि बरे करण्यासाठी वापरल्या जात आहेत.

सदर औषधी वनस्पतींची  गुणवत्ता व उपलब्धता पाहून केंद्र शासनाच्यावतीने आयुष मंत्रालयामार्फत संशोधन व विकास केंद्र स्थापन करावे. तसेच औषधांच्या निर्मितीस प्रोत्साहित केले जावे आणि या व्यतिरिक्त राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत आयुर्वेद रुग्णालय सुरू केले जावे. जेणेकरुन या औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करता येईल. यामुळे स्थानिक नागरिकांना  रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. ज्या प्रकारे जगभरातील आयुर्वेद उत्पादनांची मागणी आहे, त्याप्रमाणे औषधांची निर्यात केल्याने देशाची अर्थव्यवस्था आणि स्वावलंबी भारताचा संकल्प मजबूत होण्यास मदत होईल, यासाठी लवकरात लवकर प्रकल्प सुरू करण्याची मागणी खा.   धैर्यशील माने यांनी केली.