कोल्हापूर (प्रतिनिधी) : इ.पी.एफ. पेन्शनधारकांना कोशियारी समितीच्या शिफारशीप्रमाणे किमान तीन हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता लागू करावा, पेन्शनरांच्या विधवा पत्नींना दोन वर्षाचे भत्ते त्वरित मिळावेत, यासह विविध मागण्यांसाठी सर्व श्रमिक संघ प्रणित ई.पी.एफ.पेन्शन धारकांच्या वतीने आज (मंगळवार) आंदोलन करण्यात आले.

विक्रम हायस्कूल येथून भाजप कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने पेन्शनधारकांनी हायस्कूल समोरच जोरदार निदर्शनं केली. या वेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विक्रम हायस्कूल परिसर दणाणून सोडला. केंद्र सरकारने पेन्शनरांच्या मागण्या मान्य न केल्यास सरकारला सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी आंदोलकांनी दिलायं.

आंदोलनात आनंद कुलकर्णी, प्रकाश पाटील, प्रकाश जाधव, धोंडीबा कुंभार, चंद्रकांत बागडी, दीपक चव्हाण यांच्यासह सर्व श्रमिक संघाचे पदाधिकारी, पेन्शनधारक सहभागी झाले होते.