नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी  कोलकातामधील ब्रिगेड परेड मैदानात आयोजित केलेल्या जाहीर सभेत  मिथुन चक्रवर्ती यांनी जोरदार भाषण करत आपली राजकीय दिशा स्पष्ट केली.  मी खरा कोब्रा आहे. डंख मारला तर तुमचा फक्त फोटो उरेल, असे त्यांनी म्हटले होते.

यावर काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी  प्रतिक्रिया देताना  मिथुन चक्रवर्ती यांना खोचक सल्ला दिला आहे.  ते म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं झाले आहे. मात्र, पहिल्याच रॅलीत साप, विंचू, कोब्रा अशी तीव्र भाषा वापरायला नको होते. मिथुन हे माझे जवळचे मित्र आहेत. आम्ही अनेक सिनेमात बरोबर काम केले आहे. मिथून यांचे व्यक्तिमत्व लोकप्रिय  आहे. मात्र, पहिल्याच रॅलीत त्यांनी साप, विंचू आणि कोब्रा अशा भाषेचा वापर  करायला नको होता. सभेत राजकीय मुद्दे मांडले असते, तर बरं झाले असते.  ममता बॅनर्जी या मजबूत आहेत. त्यांना हलवणं इतके सोपे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले नाहीत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख केला असता तर आणखी चांगले झाले असते, अशी टीकाही शत्रुघ्न सिन्हा यांनी केली.